लेखक – नारायण धारप
प्रकाशन – रिया पब्लिकेशन
पृष्ठसंख्या – २३२
मुल्यांकन – ४ | ५
नारायण धरपांचं वाचलेलं हे माझं पाहिलं पुस्तक. नारायण धारप गूढ कथा लिहितात हे ही मला तेव्हा माहित नव्हतं. थोडक्यात नारायण धारप माझ्यासाठी पूर्णतः नवीन होते त्यामुळे पुस्तकाचं नाव आणि त्यातलं कथानक ह्यात कितीसं साम्य असेल ह्याचा प्रथमदर्शनी मला काहीच अंदाज आला नव्हता. नेहमीसारखं म्हातरवयात मुलांनी आई वडिलांना न विचारणं आणि मग त्यांच्या समस्या इत्यादी इत्यादी असं काहीतरी असेल असं वाटलं होतं पण…. खरोखर कथा आवडली मला. कथा फार काही वेगळी नाही तरीही मानला भावणारी आहे. संपूर्ण कथेत एक सकारात्मकता आहे. आणि महत्वाचं म्हणजे कथेतले प्रसंग विनाकारण लांबवलेले नाहीत. थोडक्यात पुढे काय? असं उत्सुकतेने वाचावं वाटतं.
असं म्हणतात ना की “ज्याच्यात एकटेपणाची हिम्मत असते त्यालाच जोडलेपणाची किंमत कळते आणि जोडलेपणातली गंमतही”; आणि हीच जोडलेपणाची गंमत सुरुवातीला एकटे असणाऱ्या विमल आणि मिस्टर उपध्यांनी शेवटी एकमेकांसोबत राहण्याचा निर्णय घेऊन अनुभवली आहे. पन्नशितलं वय हे तसं जावई- सूना येण्याचं, नातवंडांना खेळवण्याचं आणि प्रपंचातून थोडं अलिप्त व्हायला लावणारं वय.पण ह्या सगळया गोष्टी तेव्हाच सुखकर ठरतात जेव्हा आपल्याला कोणाची तरी साथ असते. अर्थातच आपल्या जोडीदाराची. जोडीदाराशिवायही ह्या गोष्टी सुखकर होऊच शकतात पण शक्यतो दुसऱ्यांसाठी, स्वतः ला मात्र एकटेपणा खायला उठतो. ना तो कोणाला सांगता येतो, ना ते पन्नशीचं वय तसं काही करायची आपल्याला मुभा देत. थोडक्यात जोडीदाराशिवाय आला दिवस तसा पुढे ढकलायचा हीच काय ती आपण आपल्या मनाची समजूत काढतो आणि पुढे चालत राहतो. पण ही कथा काहितरी वेगळं संगते.. कधी कधी आपल्या मनात खोलवर.. अगदी खोलवर रुतलेल्या, कोणाशीही बोलल्या न गेलेल्या इच्छा योगायोगानेच योग बनून आपल्यासमोर येतात आणि आपण पण त्या सहजरित्या स्विकारतो. कारण कुठेतरी असं काहीतरी घडावं ही आपलीच इच्छा असते; पण इतरांना ती अज्ञात असते आणि म्हणूनच इतर लोकांशी त्याबाबतीत जुळवून घेताना आपल्याला तणाव आणि भिती जाणवते. अशीच काहीशी घालमेल या कथेतल्या विमलची होते.
थोडक्यात सांगायचं तर माणूस एकटा कधीच राहू शकत नाही. किंबहुना परिस्थितीच कोणाला एकटं राहू देत नाही अर्थात त्यासाठी आपल्यालाही परिस्थितीच्या संकेतांना प्रतिसाद द्यायला हवा. तो दिला की सारच बदलतं. आणि या कथानकाचा हाच गाभा आहे.
योगायोगाने झालेली विमल – नानांची(मिस्टर उपाध्ये) भेट, त्यानंतर दोनच दिवसांत विमलने त्याच्याशी लग्न करायचा दिलेला होकार, त्यावर त्यांच्या मुलांच्या प्रतिक्रिया, नातवंडांच्या प्रतिक्रिया आणि त्याहून पुढे जाऊन विमल आणि नानांच्या एकमेकांबद्दलच्या प्रतिक्रिया हे फारच छान पद्धतीने मांडलं आहे.
आयुष्याच्या एका ठराविक वयानंतर पुन्हा लग्न करणं हा अजूनही न बोलला जाणारा विषय आहे.वानप्रस्थाश्रम स्विकारायच्या वयात लग्नाविषयी विचार करणं हे अजूनही चुकीचच मानलं जातं. एकटं राहून दुःखी राहण्यापेक्षा समवयस्क सोबत मिळली तर ती स्वीकारून आनंदी राहण्यात काय चूक आहे?
ह्या पुस्तकातल्या नाना आणि विमलने एकमेकांसोबत लग्नाचा घेतलेला निर्णय हा केवळ एक समवयस्क सोबत याच गरजेच्या पूर्ततेसाठीचा होता. म्हणूनच दोघांचाही एकमेकांच्या मुलांसोबत संवाद होऊ शकला आणि त्यांचा ह्या वयात लग्न करण्याचा निर्णय त्यांच्यासाकट त्यांच्या मुलांसाठीही आनंददायी ठरला.
एक साधं, सोपं आणि कौटुंबिक प्रेम व्यक्त करणारं आणि नारायण धारपांच्या लिखाणाची एक वेगळी शैली दाखवणारं हे पुस्तक एकदा वाचायला काहीच हरकत नाही.
ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स: