संपादन – नीलिमा करमरकर
समीक्षण – वैष्णवी सुरडकर
पृष्ठसंख्या – १३६
प्रकाशन – छात्र प्रबोधन प्रकाशन
मूल्यांकन – ४ | ५
विभिन्न क्षेत्रातल्या २० कर्तृत्ववान व्यक्तींनी स्वतःच्या जडणघडणी विषयी लिहिलेल्या लेखांचा संग्रह म्हणजे हे पुस्तक. छात्र प्रबोधिनीच्या हस्तलिखित स्पर्धेत बक्षीस म्हणून हे पुस्तक मिळालं आणि पुस्तकरूपाने अनेक व्यक्तिमत्वांशी संवाद साधता आला, सोबतच मार्गदर्शनही मिळालं. आपल्या भविष्याचं धूसर चित्र प्रत्येकाच्या मनात असतं, पण बरेचदा आपल्याला मर्यादित क्षेत्रांचीच कल्पना असते. या पुस्तकातून मात्र विज्ञान, कला, समाजसेवा, राजकारण अशी अनेक कार्यक्षेत्रे आपल्यासमोर खुली होतात.
यशोशिखरावर असलेल्या या व्यक्तींना दिशा कशी मिळाली? ते स्वतःला कसे घडवत गेले? वगैरे प्रश्नांची उत्तरे लेखांतून मिळतात. पुस्तकाद्वारे नकळतच भविष्यात एखाद्या विशिष्ट क्षेत्रात काम करण्याची प्रेरणा मिळते. पुस्तकातील प्रत्येक लेखाची भाषा सहज-सोपी आणि संवादी आहे. अर्थात, वेगवेगळ्या व्यक्तींचा आढावा यात घेतल्याने भाषाशैलीत वैविध्य आढळतं.
विकास आमटे, भीमराव गस्ती ही समाजासाठी झटणारी मंडळी वाचली की सामाजिक जाणीवा प्रगल्भ होतात. आपणही समाजाचा काही देण लागतो हा दृष्टिकोन निम्हण करण्यात ते यशस्वी होतात. बाबासाहेब पुरंदरेंचं शिवचरित्र, त्यांचं प्रभावी वक्तृत्व याची कल्पना आपल्याला आहे. पण या शिवभक्तांची जडणघडण कशी झाली? त्यांना इतिहासात गोडी कशी निर्माण झाली? आणि महत्वाचं म्हणजे या छंदाला अशी काही दिशा देता येईल हे त्यांना कसं सुचलं? असे अनेक यशस्वी व्यक्तींविषयी आपल्याला पडणारे प्रश्न त्यांच्याच शब्दांतून उलगडतात.
आपल्याला दिसणाऱ्या त्यांच्या वलयांकित यशामागे वर्षानुवर्षांची मेहनत, संघर्ष त्यांच्या अनुभवांतून कळतो. कोणत्याही परिस्थितीत हार न मानता, निराश न होता जिद्दीने यशस्वी होण्याचा मंत्र ‘आम्ही असे घडलो’ या पुस्तकातून निश्चितच मिळतो. एकदा नक्की वाचावे असे पुस्तक आहे, असेच मी म्हणेल.
समीक्षण – वैष्णवी सुरडकर
ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स:
संबंधित व्हिडिओ