लेखक – किशोर शांताबाई काळे
पृष्ठसंख्या – ११२
प्रकाशन – ग्रंथाली
मुल्यांकन – ४.४ | ५
आपण सगळे कोणत्या ना कोणत्या कारणाने वेगळे आहोत. हे वेगळेपण माणसाला जितकं प्रगल्भ बनवते तितकेच त्याला खालीही खेचू शकते. हे वेगळेपण समाजनिर्मित, मानवनिर्मित तर कधी परिस्थितीनुरूप आलेल्या विविध बदलांमुळे येते. अशाच एका आपल्यासारख्याच पण तरीही वेगळ्या…. समाजाने निर्माण केलेल्या चौकटीत न राहता आपलं विश्व गवसू पाहणाऱ्या आणि पंख पसरून आभाळाकडे झेपावलेल्या नायकाची ही आत्मकथा आहे. त्यांचं नाव आहे किशोर शांताबाई काळे.
अनेकांना आश्चर्य वाटेल की, अरे यांचं नाव अस का असू शकेल?? मलाही पडला होता. पण पुस्तक वाचताना अगदी गहिवरून आलं. मनात काहूर माजलं आपण किती आनंदात आहोत आपलं आयुष्य किती सहजतेने जातंय यासाठी देवाला धन्यवाद म्हणवे वाटले. पण त्यातलं काहीच बाकीच्यांना मिळत नाही याची खंत मनाला बोचत राहील. कोल्हाटी समाजातील एका लहान मुलाची ही गोष्ट आहे ज्याला आपल्या बाप नावही माहीत नाही. तिथूनच पुढे आपण, आपली आई आणि शिक्षण यासाठी सतत आयुष्यभर झगडत राहिलेले ते पोर जेंव्हा डॉक्टर होते, तेंव्हा उर भरून येतो. पण त्यांनी सोसलेल्या त्या काळात त्याची अवस्था काय असेल यावर सतत मनात एक टाचणी टोचत राहिल्याची अस्वस्थता पसरत जाते.
घरातील बिकट परिस्थिती, आईच नाचगाण्याच काम त्यातून समाजानं सतत एक दुजा भाव आणि अशातच शिक्षणाची ती आवड या साऱ्याच एक मेतकूट या पुस्तकात वाचायला नक्की मिळेल. मनात अनेक प्रश्न उभे राहतील. समाजाची नवी बाजू आपल्या समोर उभी ठाकेल आणि मन कशातच लागणार नाही. हे पुस्तक जितकं तुम्हाला पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देईल त्याहून अधिक विचारांची आणि समाजाची एक मुंगी सतत चवल्याचा भास देत राहील. नक्की वाचा आणि जाणून घ्या की नावाच्या मध्ये शांताबाई का ??
ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स: