sambhaji marathi book review

संभाजी

पोस्ट शेयर करा:

लेखक – विश्वास पाटील

पृष्ठसंख्या – ८४८

प्रकाशन – मेहता पब्लिशिंग हाऊस

मुल्यांकन – ४.४ | ५

राजन तुम हो सांजे खूब लढे हो जंग ।

तव तूप तेज निहारके तख्त त्यजत औरंग ।।

 कवी कलशांच्या या ओळींप्रमाणे ज्या मराठा राजाने गाझी औरंगझेबाला आपला किमांश उतरवायला लावला, आपला तख्त सोडायला भाग पाडला त्या महानायकाची शौर्यगाथा म्हणजे संभाजी!

पुरंदरी शिवपोटी जन्म घेऊन अवघ्या काही काळातच मातृसुखाला पारखा झालेला शिवछावा, जन्मापासून संकटांवर मात करत आयुष्यातल्या सगळ्या लढाया जिंकणारा स्वराज्याच्या गादीचा दुसरा छत्रपती, थोरल्या महाराजांनंतर अंगावर आलेला गनीम व अंतर्गत माजलेल्या स्वार्थाच्या स्तोमाने पोखरलेल्या स्वराज्याला आपल्या असिमीत पराक्रमाने अन मुत्सद्दीपणाने सावरणारा राजा, मृत्यूलाही जिंकून घेतलेला महामृत्युंजयी धर्मवीर शंभुबाळाची गाथा म्हणजे, संभाजी !

युवराज ते छत्रपती हा संभाजी राजांचा प्रवासच मुळात खडतर. प्रचंड आव्हाने, दुफळी यांचा सतत सामना करत हिंदवी स्वराज्याचा गाडा हाकण्यात ते यशस्वी झाले ते महाराजांनी व जिजाऊंनी पाजलेल्या बाळकडूच्या जोरावर! कोवळ्या वयात दिल्लीला जाऊन मयूर सिंहासनात बसलेल्या बादशहाला नजर भिडवणारा शंभुबाळ त्याच तडफेने मृत्यूच्या दारात देखील तसेच डोळे त्यावर वटारतो. जगाच्या पाठीवर कोणालाही लाभला नाही असा मृत्यू शंभुराजांना लाभला. तप्त सळयांनी डोळे काढले गेले, जिव्हा कापली गेली, बटाट्याच्या सालीप्रमाणे कातडी सोलली गेली तरी तो नमला नाही. “असा एकही पुत्र आपल्या वाट्याला का आला नाही” हा प्रश्न खुद्द औरंगजेबाला अल्लाकडे करायला लावणारा युवराज स्वराज्याला लाभला हे या मातीचं भाग्यच!

एकाच वेळी पाच पाच शत्रू अंगावर घेणारा, जंजिऱ्याला भगदाड पाडत सिद्धीला जेरीस आणणारा व प्रसंगी पोर्तुगीजांना आपल्या दहशहतीने राजधानीचे ठाणे हलवायला भाग पाडणारा संभाजी, त्यांच्या पाठीशी ठामपणे उभ्या राहणाऱ्या कुलमुखत्यार धर्मपत्नी येसूबाई, कटकारस्थानांमधून त्यांना वाचवणारे निष्ठावंत हंबीरराव मोहिते, कवी कलश आदी मंडळींची शौर्यगाथा लिहताना विश्वास पाटलांनी जी शब्दरूपी रंगाची उधळण संभाजी कादंबरीतून केली ती उल्लेखनीय आहे.

राजा संभाजी रंगेल होता की शत्रूच्या उरात धडकी भरवणारा होता, कवी मनाचा होता की मंत्र्यांना हत्तीच्या पायी देणारा निष्ठुर राजा होता, औरंगजेबाला एक इंचही जिंकून न देणारा मुत्सद्दी होता की बुऱ्हाणपूर लुटून मुघली सल्तनत हादरवणारा चलाख शासक होता, अशा एक ना अनेक अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी संभाजी एकदा वाचायला हवी. विश्वास पाटलांनी राजांचा मृत्यू रेखाटताना केलेलं वर्णन वाचताना डोळ्यात पाणी तरळल्याशिवाय राहत नाही. जो मृत्यू वाचताना आपणास गहिवरून येतं तो मृत्यू शंभूराजांनी कसा भोगला असावा या विचारांनी मन सुन्न होतं. संभाजी या व्यक्तिमत्वाला न्याय देताना इतिहास कमी पडतो व तोच विश्वास पाटलांनी आपल्या शैलीत उत्तमरीत्या मांडल्यामुळे संभाजी ही कादंबरी साहित्यक्षेत्रात व वाचकांच्या मनात उजवी ठरते.

chatrapati sambhaji raje vishwas patil maratha history mehta


ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स:


[maxbutton id=”4″ url=”https://www.majesticreaders.com/book/878/sambhaji—buy-marathi-books-online-at-majesticreaders-“]




संबंधित व्हिडिओ

पोस्ट शेयर करा:

About the author

गिरीश खराबे

View all posts

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *