लेखक – सुहास शिरवळकर
समीक्षण – सौरभ नायकवडी
पृष्ठसंख्या – १९६
प्रकाशन – दिलीपराज प्रकाशन प्रा. लि.
मूल्यांकन – ४.० | ५
रहस्यमय कादंबरीवर समीक्षा लिहिण्याचा हा पहिलाच योग. ‘समांतर’ नावाची वेब सिरीज रिलीज झाली. वृत्तपत्रात वेब सिरिजच्या प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीवरून हि वेब सिरीज सुहास शिरवळकर यांच्या ‘समांतर’ ह्या कादंबरीवर आधारित आहे हे कळलं. वेब सिरीज पाहण्याआधी ती कादंबरीच वाचण्याचा मोह झाला आणि मग तिला शोधण्याचा प्रवास सुरू झाला. लॉकडाऊनच्या काळात बुक स्टॉल अथवा ग्रंथालयास भेट देणे शक्य नसताना असे पुस्तक वाचायला मिळणे म्हणजे भाग्यच.
समांतर हि कथा कुमार महाजन ह्या पात्राभोवती फिरते, अर्थातच तो कथेचा नायक आहे. आपल्या आयुष्यात घडत असलेले प्रसंग कोणाच्याच आयुष्यात आजवर घडले नसतील, असं त्याचं ठाम मत असतं. स्वतःचे भविष्य जाणून घेण्यासाठी कुमार आपला मित्र वाफगावकर ह्याच्या समवेत एका स्वामीमहाराजांकडे जातो. तिथे त्याला एक आश्चर्यकारक गोष्ट कळते ती म्हणजे, ‘सुदर्शन चक्रपाणी’ नामक इसम आणि ‘कुमार’ ह्या दोघांच्या हस्तरेषांमध्ये विलक्षण साम्य आहे. मग इथून सुरू होतो कथेतील गुढ व्यक्तिमत्व (सुदर्शन चक्रपाणी) ह्याला शोधण्याचा प्रवास. तिथून पुढे मग त्याचा शोध, शोध घेत असताना त्याच्या आयुष्यात घडलेल्या घटना; वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या आयुष्यात घडून गेलेल्या घटना आणि कुमारच्या आयुष्यात घडत असलेल्या घटना थोड्या फार फरकाने सारख्याच असतात. त्याचा शोध घेत कुमार मध्य प्रदेश येथील ‘पलान’ ह्या गावी जाऊन पोहोचतो. तिथे त्याला चक्रपाणी भेटतो. आणि तिथूनच कथा नवीन वळण घेते.
कथा वाचत असता शब्दांमध्ये एक कमालीची गुढता जाणवते. कथेत सुदर्शन चक्रपाणीचा जोपर्यंत प्रवेश होत नाही तोपर्यंत त्याच्याबद्दलची उत्सुकता लागून राहते. कादंबरीचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे पन्हाळा ह्या परिसराचं केलेलं वर्णन.
वेब सीरिजमुळे ही कादंबरी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मुळ कथेचा गाभा तसाच ठेवून कथेत थोडा बदल सिरीजच्या निर्मात्यांनी केला आहे. सुहास शिरवळकर ह्यांनी लिहिलेली रहस्यमय कादंबरी एकदातरी नक्की वाचावी अशी आहे.
समीक्षण – सौरभ नायकवडी
ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स:
संबंधित व्हिडिओ
????????????????
खरं म्हणजे मी ही कादंबरी वेब सिरीज बघितल्यानंतर लगेच खरेदी करून वाचली सुद्धा…..त्या आधी शिरवळकर ह्यांचे दुनियादारी हे पुस्तक उपजिल्हा रुग्णालय चांदवड ला असतांना तेथील ग्रंथालयाचा सदस्य असतांना वाचले होते आणि ते मला आवडले ही होते म्हणजे शिरवळकर सुद्धा आणि आता ह्या समांतर कादंबरी सोबत त्यांची अजून दोन पुस्तकं मी खरेदी केली आहेत. समांतर वाचल्यावर वेबसिरीज अजून संपलेली नाही असंच वाटत आहे कदाचित तिचा अजून पुढचा भाग येईल….
खुप सुंदर अनुभव आला समांतर वाचताना आणि बघताना पण
अगदी शेवटच्या पानापर्यंत गुंगवून ठेवणारं पुस्तक. पुस्तकात रहस्य आहेच आणि त्या रहस्यापर्यंतची उत्सुकता सुशि कुठेही ढळू देत नाहीत. आणि त्या रहस्याची उकल करणारी शेवटची दहा-पंधरा पानं तर अफलातून लिहिली आहेत. सुदर्शन चक्रपाणी एकटाच त्या रानात का आणि कसा राहू शकतो याची सर्व उत्तरं शेवटीच मिळतात. अगदी हळूवार आपल्या नकळत साऱ्या प्रश्नांची उत्तरं मिळतात. संपूर्ण मनोरंजन होतं पुस्तक वाचताना…. नक्कीच वाचनीय..