लेखक – शरद तांदळे
समीक्षण – कुमार विश्वजीत
पृष्ठसंख्या – ४३२
प्रकाशन – न्यू ईरा पब्लिशिंग हाऊस
मूल्यांकन – ४.५ | ५
कथा, नाटक, फिल्म, कार्टून या माध्यमातून रावण म्हणजे क्रूर, अधर्मी, दहा तोंडांचा, सितेच अपहरण करणारा, नकारात्मक, वाईट व्यक्ती असं सतत लहानपणापासून मनावर बिंबवल गेल आहे. पण खरंच रावण तेवढा क्रूर होता का? त्याला दहा तोंड होती का? रावणाचे आई वडील कोण? लंका खरंच रावणानी बांधली होती का? रावणा जवळ पुष्पक विमान होतं का? अशा बऱ्याच प्रश्नांची विज्ञाननिष्ठ उत्तर मला “रावण: राजा राक्षसाचा”या शरद तांदळे लिखित मराठी कादंबरीतून स्पष्ट होण्यास मदत झाली.
हजारो वर्षापासून हा समाज रावणाला समजून न घेताच जाळत आला तरी तो संपला नाही. असा महानायक आणि त्याच्या व्यक्तित्वाचे विविध पैलू लेखकाने अतिशय सुंदर रित्या उलगडले आहेत. शास्त्र ,आयुर्वेद, वेद,राज्यशास्त्र ,न्यायशास्त्र ,दर्शन शास्त्र, आणि संगीत शास्त्रा सारख्या विविध विषयात पारंगत असून बुद्धिबळ,रुद्रवीना ,रावणसंहिता ,कुमारतंत्र ,शिवतांडव स्त्रोत, यातून ज्ञानाच्या नवीन कक्षा रुंदावल्या. दैत्य, दानव ,असुर आणि कित्येक भटक्या जमातींना एकत्र करून राक्षस संस्कृतीचा पाया रचला. तरीही रावणाची नेहमीच उपेक्षा केली गेली आहे. रावणाच्या आयुष्यात घडलेल्या अघटित घटना, आलेली अनपेक्षित वादळ.त्यानंतरही विचारांच्या झालेल्या चिंध्या जपत स्वतःच्या हिमतीवर मिळवलेलं लंकाधिपतीच पद. इतर राजासारखं फक्त स्वतःच सुख उपभोगली नाही तर जनता हि सोन्याच्या घरात राहत होती.
सीतेचे अपहरण केलं पण तिच्या संमती शिवाय तिच्या शरीराला कधीच स्पर्श केला नाही, तिची विटंबना केली नाही.त्याला अहंकार होता हे मान्य पण त्याला पश्चाताप होता हेही मान्य करावच लागेल. रावणाच्या मृत्युसमयी प्रत्यक्ष रामाने लक्ष्मणाला त्याच्याकडे पाठवुन ज्ञान संपादन करण्यासाठी सांगितलं आणि रावणाने देखील लक्ष्मणाला आपला शिष्य म्हणून स्वीकारले होते. अशा राजाची फक्त एकच बाजू पाहून दरवर्षी मोठ्या उत्साहात जाळण्यात येत, या पाठीमागे आहे सनातनी मानसिकता,जोपर्यंत ही मानसिकता नष्ट होत नाही तोपर्यंत ही अज्ञानी कृती या देशात बंद होणार नाही.
लेखकाच्या लिखाणाची पद्धत अतिशय भुरळ घालणारी आहे, जणु रावणच आपल्याशी संवाद साधतो आहे असं सतत भासत. रावणाची दुसरी बाजू, हळवी बाजू, दशकग्रीव ते लंकाधिपती रावण याचा अचंबित करणारा प्रवास आणि लहानपणापासून मेंदूवर कोरण्यात आलेल्या भाकड रावणाची प्रतिमा गळून पुनश्च चित्तथरारक कर्तुत्वाने संपन्न असलेल्या रावणा विषयी विचार करण्यास भाग पाडणारी कादंबरी.
समीक्षण – कुमार विश्वजीत
ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स:
संबंधित व्हिडिओ
सावत्र बहिणीसाठी युद्ध करणारा रावण आपल्याला कधीच आवडत नाही मात्र झाडा आडून बाण मारून वालीहत्तेच कारण असलेला राम, युद्धाचे नियम मोडून मेघराजला वीर मरण देणारा लक्ष्मण, राज पदासाठी लोभ असून आपल्या सख्या भावाच्या विरोधात जाणारा बिभीषण आणि सख्या भावाच्या बायकोसोबत विवाह करणारा सुग्रीव आपल्याला नेहमीच आदर्श वाटतात. आईवर झालेल्या बलात्काराचा बदला घेणारा, ब्रह्मदेवाकडून शिक्षण घेणारा, यम आणि वरूनावर विजय मिळवणारा रावण खरंच समजून घ्यायचा असेल तर ही कादंबरी नक्की वाचा… भावनांचा आणि ज्ञानाचा योग्य वापर करून बनवलेला राक्षस संस्कृतीचे नियम खरंच सुंदररित्या लेखकाने मांडले आहेत. जिच्या मूळ एवढं रामायण घडलं त्या सीतेची लक्ष्मणाबद्दल ची भावना ही खरंच विचार करायला लावणारी आहे. शेवटी सगळ्या गोष्टी ह्या कुळ, राजधर्म आणि साम्राज्य वाढीसाठीच आहेत हे समजून येते. सोन्याची लंका असलेल्या रावणाला सुध्दा परत त्याचा मेलेला पुत्र माघारी आणता येत नाही हे खरंच. रामायणातील राम आणि रावण हे ह्या पुस्तकात फार वेगळे आहेत, हनुमानाच्या शेपटीला आग का लावली, अश्या अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला ह्या पुस्तकात नक्की मिळतील